जळगाव (प्रतिनिधी) बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या काकांना तरुण रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत जात असतांना त्याच्या दुचाकीचा अपघात होवून प्रणव प्रशांत कुदळे (वय २२, रा. तुळजाई नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ घडली. एकुलत्या एक मुलावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ अपघात !
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या तुळजाई नगरात प्रणव कुदळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. चार दिवसांपुर्वी त्याच्या बहिणे लग्न झाले आहे. तसेच त्याचे काका राहुल कुदळे हे त्याच्या बहिणीला घेवून आले होते. त्यानंतर बुधवार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रणव हा काकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला. त्यांना सोडून घरी परतत असतांना सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये प्रणव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काकांनी फोन केला आणि अपघाताची माहिती मिळाली !
काकांना रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर काकांनी प्रणव याला घरी पोहचल्यानंतर कॉल कर असे सांगितले. परंतु बराच वेळ झालातरी प्रणवचा फोन आला नाही, त्यामुळे त्याच्या काकांनी त्याला फोन केला. यावेळी त्यांना प्रणवचा अपघात झाला असून तो गंभीर झाल्याचे कळले. त्यांनी लागलीच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांना पुतण्या प्रणव हा अपघातात मयत झाल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला.
रिक्षा चालकाने दोघ जखमींना केले रुग्णालयात दाखल
प्रणवचा अपघात झालेल्या ठिकाणी आणखी एक जण जखमी अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, ही घटना त्याठिकाणाहून जाणाऱ्या रिक्षा चालकाला समजाताच, त्याने दोन्ही जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी असलेल्या प्रणवसह अनोळखी जखमींना मयत घोषीत केले.
एकुतल्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
चार दिवसांपुर्वीच प्रणवच्या बहिणीचा विवाह असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. लग्ग्रकार्य आटोपल्यानंतर प्रणव हा वडीलासोबत कामाला पुन्हा सुरुवात करणार होता. आनंदाचे वातावरण असलेल्या कुदळे कुटुंबातील प्रणववर दुर्देवी काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतले. तसेच घरातील एकुलत्या एक मुलाला हिरावून घेतल्याने क्षणार्धात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यूनंतर आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे.