चाळीसगाव (प्रतिनिधी) काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पूर आला आहे.
३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतर काल रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे. शहराच्या मधून जाणाऱ्या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील रहदारी बंद झालेली आहे. तर काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, तालुक्यातील ओढरे येथील जलप्रकल्प हा जीर्ण झाला असून तो पूर्णपणे भरलेला आहे. हा प्रकल्प सध्या ओसंडून वाहू लागला असून तो फुटण्याची भिती तेथील काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.