जळगाव (प्रतिनिधी) नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार? मुलांना प्रत्यक्ष शाळेत जावं लागणार की ऑनलाइन वर्ग भरणार? असे अनेक प्रश्न पालकांना पडले असताना त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन जुन महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्ट केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय कोरोनावरील लसीकरणाला देखील सुरूवात झाली असून, साधारण एप्रिल- मेपर्यंत संपुर्ण लसीकरण होवू शकते. पालकांच्या मनात देखील मुलांना शाळेत पाठविण्या संदर्भात भिती राहणार नाही. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात जून महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्याची शक्यता राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्ट केले. कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाली असून, अनेकांच्या मनात या बाबत भिती आहे. या विषयावर बोलताना पाटील म्हणाले, की प्रत्येकाने लसीकरण करावे. मोठ्या अधिकाऱ्यांनी लस घेतली असल्याने मनात असलेली भिती दूर करावी. कारण यापुर्वी देखील देवीची लस किंवा टीटीची लस घेतल्याने थोडा ताप येत असतो. यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर काहींना थोडा त्रास जाणवला असला, तरी घाबरून न जाता सगळ्यांनी लस घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.