जळगाव (प्रतिनिधी) रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध केला. यावेळी त्या रिक्षा चालकासोबत असलेल्या टोळक्याने साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. ही घटना दि. २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील बेंडाळे चौकात रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथून एकेरी वाहतुक सुरु आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, गणेश नेटके, विशाल पाटील हे बेंडाळे चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षा व फळविक्रेत्यांना त्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. तेथील एका चालकाने त्याची (एमएच १९, सीडब्ल्यू ३४७१) क्रमांकाची रिक्षा बाजूला न करता पोलिसांशी वाद घालत मी रिक्षा रस्त्यातच उभी करणार, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत अरेरावी केली.
हातात साखळदंड घेवून आले घटनास्थळी
पोलीस व रिक्षा चालकांमध्ये वाद सुरु असल्याने त्याठिकाणी पुन्हा चार ते पाच जण आले. त्यातील एका जणांच्या हातात साखळदंड होता. दुचाकीस्वार अल्ताफ अहमद याने ‘मार यांना सोडू नको’, अशी चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली व तेथे शनिपेठ पोलिस पोहचले. पथकाने सर्व जणांना ताब्यात घेत रिक्षा व दुचाकीही ताब्यात घेतली. तसेच दुचाकीच्या डिक्कीत कोयता देखील आढळून आला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल अन् अटक
या प्रकरणी वाहतुक पोलीस ज्ञानेश्वर कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४), मुजम्मील अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८) तिन्ही रा. बालाजीपेठ, रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर), आदील बेग शरीफ बेग (२७, रा. रामनगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले. पुढील तपास पोउनि योगेश ढिकले करीत आहेत.