मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे एका आंदोलनातील जुने छायाचित्र पोस्ट केले आहे.. या छायाचित्रासोबत अंबादास दानवे यांनी, ‘लाठी चार्ज झाला की….… पळणारे म्हने बाबरी पाडायला गेला होता’, अशी कॅप्शन लिहली आहे.
अंबादास दानवे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, हे आता पाहावे लागेल. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तूनही याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे फडणवीस म्हणतात. फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते आणि शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. मग देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का, याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेने केली होती.
बाबरी प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आशिष शेलार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच फटकारले. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा आहे. कुठेही काही झालं की आमच्यामुळेच झालं. ते युवराजांपासून ते विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत. शिवसेना ही बाबरी मशीद प्रकरणात अदखलपात्र असल्याचे त्यांनी म्हटले.