मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार आहे. राज्याचे गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. भाजपने सचिन वाझे यांच्या विरोधात सभागृहात कालपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली.
कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली. अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
“कोण लागून गेला सचिन वाझे?,” प्रवीण दरेकर संतापले
“सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.