मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने अग्रलेख लिहत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवलं. त्या पत्रावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे.
‘भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा त्यांना पुर्ण अधिकार आहे. आम्ही त्याचं उत्तर तसंच तसं छापलं आहे, असं सांगतानाच त्यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे. तसंच, भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का, असा सवालही राऊतांनी केला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
“मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं पाटलांनी म्हटलंय.”