धरणगाव (प्रतिनिधी) एखाद्या गावाने आपल्याला मतदान दिले की नाही हा महत्वाचा मुद्दा नसून यापेक्षा त्या गावाची गरज काय ? हे पाहून विकासाला आपण सातत्याने प्राधान्य दिले आहे. यामुळे पथराडसह अन्य गावांच्या गरजा लक्षात घेऊन आपण विकास करत असतो, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
पथराड, वंजारी खपाट, टहाकळी आणि आव्हाणी या गावांमधील रस्त्यांचे भूमिपुजन आणि अन्य कामांच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणाच्या पलीकडे जात आपण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
१ कोटी ४५ लक्ष कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन आणि अन्य कामांचे लोकार्पण करण्यात आले. यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पथराड ते वंजारी खपाट रस्त्याची डांबरीकरणसह विशेष दुरूस्ती, पाळधी-फुलपाट ते आव्हाणी रस्त्याची विशेष दुरूस्ती, पथराड ते चांदसर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण, आव्हाणी ते दोनगाव रस्त्याचे डांबरीकरण या रस्त्यांचे भूमिपुजन करण्यात आले. तर पथराड बुद्रुकला स्मशानभूमि, येथेच पेव्हर ब्लॉक बसविणे, स्मशानभूमि दुरूस्ती व पेव्हर ब्लॉक बसविणे, फुलपाट गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, टहाकळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, आव्हाणी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे आणि पथराड येथे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांच्या लोकार्पणाचा समावेश होता. या सर्व कामांचे एकत्रीत मूल्य सुमारे १ कोटी ४५ लाख इतके आहे. याप्रसंगी परिसरातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.प. सदस्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भांडणे लावणारांचा हेतू लक्षात घ्या
दरम्यान, यानिमित्त पथराड येथे आयोजीत कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पथराडसह परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन रोडचे काम करण्यात येत आहे. कोणतीही राजकीय लाभ-हानी लक्षात न घेता त्या गावाची गरज लक्षात घेऊन विकासकामे करीत आहे. मात्र जे कुणी गावात भांडणे लावतात, गावात फुट पाडतात, मने कलुषीत करतात त्यांचा हेतू लोकांनी लक्षात घेऊन अश्या मंडळींना थारा देता कामा नये. असे मत ना. पाटील यांनी व्यक्त केले. तर पक्षविरहीत विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आमदार निधीची उपयुक्तता वाढली
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य शासनाने आता ४ कोटी रूपयांच्या आमदार निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील त्या – त्या मतदारसंघातील वाढीव कामे करता येणार आहे. तर यासाठी १० लाखांवरील कामे हेच फक्त ई-निवीदेने होणार आहे. यामुळे आता विकास कामांची गती वाढून विकासासाठी कोणताही अडसर येणार नसल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य डॉ. दीपक पाटील व मिथुन पाटील यांनी केले तर याप्रसंगी प. स. सभापती मुकुंदराव नंनवरे व जि. प. सदस गोपाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी प. स. सभापती मुकुंदराव नंनवरे व जि. प. सदस प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी प. स. सदस्य प्रेमराज पाटील, दामू आण्णा पाटील, गजानन पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, परिसरातील सरपंच मनीषा महाजन, उत्तम भिल, वसंत लंके, विलास महाजन, आव्हाणी, टहाकळी फुलपाट येथील सरपंच हरी पाटील, दीपक चव्हाण, सदाशिव पाटील, उपसरपंच दिलीप पाटील, दत्तू पाटील, शाखा प्रमुख विठोबा पाटील, भिका पाटील, अशोक पाटील परिसरातील सर्व ग्रा.पं. सदस्य लहू लंके, किरण बोरसे, चोरगाव सरपंच आबा लंके, नवल कोळी, संजय गांधी निराधार योजनचे सदस्य संजय महाजन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मुख्य अभियंता जे. एस. सोनवणे, अरुण पाटील, अनिल पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, मच्छिंद्र कोळी व नवल पाटील आदी उपस्थित होते.