
पंढरपूर (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी यंदा पंढरपुरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली. सुमारे ३५ ते ४० लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित दर्शन मिळावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा स्वतः मैदानात उतरून नेतृत्व केले.
गेल्या दोन दिवसांपासून पंढरपुरात तळ ठोकून असलेल्या मंत्री महाजन यांनी सुरुवातीपासूनच गर्दी नियोजनाची सूत्रे हातात घेतली. शहरातील विविध भागांची मोटारसायकलवरून पाहणी करत त्यांनी पोलिस व प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेनंतर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सलग १२ ते १४ तास मंत्री गिरीश महाजन हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गर्दी नियंत्रणासाठी कार्यरत होते. महाद्वार परिसरासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी, जिथे अनेक रस्ते एकत्र येतात, तेथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण मनोऱ्यातून त्यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवले. वारकऱ्यांना शुभेच्छा देतानाच पोलिसांचे मनोबलही त्यांनी वाढवले.
एखाद्या मंत्र्याने केवळ आदेश देण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून पोलिसांसोबत तासन्तास उभे राहून काम करणे, ही बाब उपस्थित वारकरी आणि नागरिकांसाठी समाधानाची ठरली. प्रत्येक भाविक सुरक्षितपणे दर्शन घेऊन परतावा, हीच भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आली.
विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नव्हे. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारीत मंत्री गिरीश महाजन यांनी अशीच जबाबदारी स्वीकारत प्रत्यक्ष गर्दी व्यवस्थापनात सहभाग घेतला आहे. संकटाच्या काळात घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला दिशा देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीवर सतत लक्ष ठेवत त्यांनी जबाबदारी पार पाडली. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसोबत केलेली त्यांची ही अथक सेवा आणि समर्पण निश्चितच कौतुकास्पद ठरले असून, “जनतेसाठी सदैव मैदानात असलेला नेता” ही त्यांची प्रतिमा यामुळे अधिक दृढ झाली आहे.
















