जळगाव (प्रतिनिधी) विधिमंडळ सभागृहाच्या बाहेर जो वाद झाला त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले होते. सूडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे, असे प्रतिपादन भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले की, शिवसेनेला गोव्यात कुत्र देखील ओळखत नाही हे स्पष्ट होईल, असंही महाजन म्हणाले.
विधान मंडळाच्या सभापतींच्या दालनात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी प्रभारी सभापती भास्करराव जाधव यांच्या दालनात त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्याबाबत असभ्य वर्तन करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले होते. यावर महाजन यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, विधानसभेचे प्रभारी सभापती भास्कर जाधव स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या वर समजतात. हा प्रकार घडला तेव्हा त्यांनी संयम दाखवला असता तर तसा प्रसंग घडला नसता. या संदर्भात आलेल्या प्रतिक्रीयांचा विचार करता, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बाजूने जर निर्णय झाला तर त्याचे स्वागत आणि झाला नाही तर ते टीका करतात. या सरकारला त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, म्हणून हे निलंबन केले, असा आरोप देखीलमहाजन यांनी केला.
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार घाबरले आहे. सरकार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व करत आहे. त्यामुळेच भीतीने त्यांनी बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन केले. याआधी असे कुणी केले नव्हते. तुम्हाला लोकशाहीची पायमल्ली करून चालणार नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सर्व बाबतीत आतापर्यत न्यायालयाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही. मुख्यमंत्री दोन वर्षे झालेत घरात बसले आहेत. राज्यात वाऱ्यावरची वरात सुरू आहे.
गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही आता किराणा दुकानात देखील वाईन विक्री सुरू केली. सर्वाना लायसन्स देऊन स्वतःचे खिसे गरम करत आहेत. आम्ही म्हणतो पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा पण ते कमी करणार नाही. इतके महत्वाचे प्रश्न असताना त्यावर निर्णय घेत नाहीत. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले की, शिवसेनेला गोव्यात कुत्र देखील ओळखत नाही हे स्पष्ट होईल.