भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. साखरपुडा झाल्यानंतरही मुलगा गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करत असल्याच्या रागातून पित्याने त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर हैवान पित्याने त्याच्या छातीत लाथ मारुन त्याचा जीव घेतला. हत्येनंतर कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिला होता. १५ दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी एका दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली.
बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ही घटना निबोला पोलिस स्टेशन क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. पाच जानेवारीला रुपरेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृताचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृताच्या घरी हाच दोर सापडला, जो मृतदेहाच्या हातपायांमध्ये बांधलेला होता. या आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहिणीची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी हत्येची कबुली दिली.
साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डसोबत गप्पा
रामकृष्णच्या आई, वडील आणि बहिणीने सांगितले की, त्याचा साखरपुडा झाला होता. असं असूनही तो दिवसभर दुसऱ्या मुलीशी बोलत असे. २ जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास रामकृष्ण तरुणीशी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याचे वडील भीमन सिंह संतापले आणि त्यांनी रामकृष्णवर आरडाओरड केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्याने रामकृष्णच्या कानशिलात लगावली आणि ढकलून दिले. धक्का दिल्यामुळे रामकृष्ण बाथरुमच्या भिंतीला धडकून जमिनीवर पडला.
रामकृष्णचे वडील इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या मस्तकात इतका संताप होता, की त्यांनी रामकृष्णच्या छातीवर जोरदार लाथ मारली. रामकृष्णा कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यामुळे वडिलांनी घाबरून त्याचे हात पाय दोरीने बांधले. यानंतर वडील, आई जमनाबाई आणि बहीण कृष्णाबाई यांनी मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीत फेकून दिला. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली.