चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे आणि दरेगाव येथे उष्माघाताच्या सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरेगाव येथील हरसिंग रायसिंग गायकवाड (वय ६०) हे शेतमजुरीचे काम करतात. दुपारी ३ वाजेच्या सुमारास चक्कर येवून त्यांचा अचानक मृत्यू झाला. गायकवाड हे घराजवळच असलेल्या एका दुकानापर्यंत गेले, तेथून घरी आल्यानंतर चक्कर येवून ते जागीच कोसळले. रुग्णालयात घेवून जाण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत इंदिरानगर, नवेगाव मेहूणबारे येथील राजेंद्र शिवाजी कोळी (वय ४५) हे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सहकाऱ्यांसह खडकीसीम धरणात ट्युबवर बसून मासेमारीचे जाळे टाकत मासे पकडत होते. भर उन्हात पाण्याची बाष्पिभवन होत असतांना आद्रर्ता ७० टक्यांपर्यंत वाढलेली होती. त्यांनी डोक्याला रूमाल देखील बांधलेला नव्हता. यामुळे अचानकपणे त्यांना चक्कर आल्याने पाण्यात कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढून मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वाढत्या तीव्र उन्हात बाहेर पडताना प्रत्येकाने जरा जपून, योग्य काळजी घेऊनच बाहेर पडले पाहिजे, असा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आला आहे. देशभरात सर्वाधिक ‘हॉट सिटी’ म्हणून यंदा दोनवेळा जळगाव शहरातील तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात जळगावच्या तापमानाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोचला होता. त्यामुळे काही दिवसांपासून उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत.