धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी हरकत घेतली आहे. प्रभाग रचना ही गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली नसल्याचंही ते म्हणाले.
श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. ज्यात सत्ताधारी गटाने स्वतःच्या राजकीय फायदयाच्या दृष्टीने सोयीची अशी प्रभाग रचना बनवून घेतलेली असल्याचा माझा स्पष्ट आक्षेप आहे. सदरची प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी गटाने स्वतःच्या सोयीनुसार सदर प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे ती चुकीची व बेकायदेशीर अशी आहे. प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ७ नोटीस बोर्डावर दर्शविण्यात आलेला नाही. त्याची सत्यप्रत देण्यात यावी. हरकत व सुचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना स्विकारण्याची व्यवस्था नगरपालिका कार्यालयात करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना पोच पावती देतांना दिनांक व वेळ नमूद करण्यात यावे हरकती व सुचनांना क्रमांक देण्यात यावेत अशी कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही. प्रत्येक प्रभागात हेतुपुरस्कर मुस्लीम वस्ती, गरीब वस्ती (स्लम एरिया) सामाईकरित्या विभागून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जेणेकरून या गोर गरीब व गरजू लोकांना पैश्याचे आमिष दाखवून निवडणुकीत सत्ताधारी गटाला प्रभाव टाकता येईल.
सदरची प्रभाग रचना ही गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली नाही तसेच प्रत्येक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी केलेली नाही. तसेच सदरची रचना निरपेक्ष व निष्पक्षपणे केलेली नाही सदरच्या प्रभाग रचनेत एका विशिष्ट समुदायाचे म्हणजेच मुस्लीम समुदायाचे विभागीकरण प्रत्येक प्रभागात केलेले दिसून येते त्यामुळे सदरची प्रभाग रचना ही जातीविरहित व निष्पक्ष अशी नाही.
सध्या गुगलमध्ये समाविष्ट असलेले बरेचसे भाग नकाशात दिसून येत नाहीत त्यामुळे गुगलच्या नव्याने तयार असलेल्या नकाशाचा वापर केल्याचे दिसून येत नाही प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नदया, नाले, डोंगर, रस्ते, पलाय ओव्हर इत्यादींचा विचार न करता सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. यासंदर्भात आंगोलिक स्थिती तथा सामाजिक गणना याचा विचार न केल्याने अनेक वस्त्यांचे विभाजन झालेले आहे. ते खालीलप्रमाणे :
अ) समाजानुसार आग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाश्यात दाखविण्यात आलेले नाहीत. जसे कि, लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर ज्याने या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही. जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.
आ) विविध समाजाचा माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज, दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो.
इ) प्रत्येकाचा स्वत: नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची सूची दिल्यास मुस्लीम समाज कल्याप्रकारे विभागाला गेला आहे हे स्पष्टपणे दिसून येईल प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आले नाही.
उदाहरण : प्रभाग क्रमांक हा बनवितांना राष्ट्रीय महामार्ग ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आलेला आहे.
तरी वरील सर्व परिस्थिती पाहता राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आलेली असून सदर रचना हि त्रयस्त यंत्रणेमार्फत म.उप जिल्हाधिकारी सो स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा खाली सदरची प्रभाग रचना तयार करण्यात यावी, असे हरकतीत म्हटले आहे.