धरणगाव (प्रतिनिधी) येथील गायरानसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी व्हावी. तसेच अतिक्रमण काढण्यासाठी गायरान बचाव मंचाच्यावतीने पशुधन पालक, शेतकरी आदीसह शासकीय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे १७ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
धरणगाव शहरातील अमळनेर रोड लगत असलेल्या गट नं. १२४८ व १२४८/१, १२४८/२ मधील गायरान जमीन ३ हेक्टर ५१ आर असून त्या जमिनीचा पूर्वापार पासून गायरान म्हणून वापर केला जात आहे. आणि संबंधित गट नंबर वरील सातबाऱ्यावर देखील गायरानसाठी आरक्षित म्हणून उल्लेख आहे. असे असताना देखील धरणगावातील काही समाजकंटकांनी मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेला हाताशी धरून संगनमताने सदरील गायरान जागेवर बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे. त्याच बरोबर पूर्ण गायरान जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास परिसरातील गायींना व पशुधनाला चरण्यासाठी कुठलीही जागा शिल्लक राहणार नाही, शहरालगत ही एकच जमीन गायरान म्हणून आहे. या जमिनीवर जर अतिक्रमण करून कब्जा झाला तर गुरांनी चरण्यासाठी कुठे जावं? असा मोठा प्रश्न निर्माण होईल ही बाब लक्षात घेता त्याविरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी अतिक्रमण विरोधात दि. २८-१२-२०१५ ला जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु त्या तक्रार अर्जाची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी घेतली नाही. म्हणून दि. ०९-०९-२०२१ ला पुन्हा तक्रार करण्यात आली. व महाशय जिल्हाधिकारी यांनी धरणगाव तहसीलदार व न. पा मुख्याधिकारी यांना दि. १३-०९-२०२१ रोजी आदेश दिले की, बेकायदेशीर बांधकाम थांबवून अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे. परंतु तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आजतागायत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कार्यवाही केलेली नाही म्हणून दि २०-१०-२०२१ रोजी तहसीलदार, धरणगाव यांना गायरान बचाव मंचाने निवेदन दिले होते. त्यानंतर आतापर्यंत आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. गायरान बचावच्या समर्थनार्थ २२ हजार नागरीकांनी सह्या दिलेल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन अतिक्रमण काढण्यासाठी दि. १७-११-२०२१ रोजी गायरान बचाव मंचाच्यावतीने पशुधन पालक, शेतकरी, इत्यादीसह शासकिय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. मोर्चानंतर २२ हजार नागरीकांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येईल.
याप्रसंगी राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती निर्मल आघाडयाचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दनहरीजी महाराज तसेच रामेश्वर येथील मंहत प.पु. स्वामी नारायनाचार्य व श्री श्री १००८ महा मंडलेश्ववर ह.भ.प. भगवानदासजी महाराज यांचे आशीर्वचन लाभणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.