मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे उद्भवलेल्या (corona) असामान्य परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत (ssc exam) दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम, अशा भावना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या.
तसेच या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असं आवाहन करत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दाहवीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यांना श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत दोन परीक्षांमध्ये पुन्हा प्रविष्ट होता येईल. मार्च 2022 च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट 2022 व मार्च 2023 च्या परीक्षेस श्रेणीसुधारसाठी प्रविष्ट होण्याच्या दोन संधी देण्यात येतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.
या परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,68,977 नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.हा निकाल आनंददायक व आशादायक आहे, असंही गायकवाड म्हणाल्या आहेत.