जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली येथे देविदास प्रकाश गायकवाड या तरूणाने कर्जबाजारी व नैराश्येतून राहत्या पत्र्याच्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. २२ मार्च रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील रहिवासी देविदास प्रकाश गायकवाड हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून मिस्तरी काम करीत होता. त्यांनी एका बचतगटाच्या माध्यमातून कर्ज काढले होते. यातच देविदास यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना हालचाल देखील करता येत नव्हती. याच आजाराला कंटाळून ते गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या पत्र्याच्या घरात छताला गळफास घेत आत्महत्या केली. घरात त्यांची लहान मुले आली असता त्यांना आपल्या वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या आईला सांगितले असता, त्यांनी तात्काळ घरी धाव घेतली. दरम्यान ,परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ खाली उतरवित शासकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.