नवी दिल्ली (वृत्तसंस्था) द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते एका सभेत बोलत होते.
उदयनिधी स्टॅलिन यांनी “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचं देखील म्हटलं आहे. “तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
यादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये असं त्यांनी म्हटलं आहे. “उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत”, असं ट्विट बांसुरी स्वराज यांनी केलं आहे.
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते.ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते,” असं त्यांनी म्हटलं आहे.