मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. जर पाकिस्तानला भारतावर विजय मिळवायचा असेल तर त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंना ‘झोपेचं औषध’ द्यावं लागेल, असं शोएबने म्हटलंय.
‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज भारत आणि पाकिस्तान दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाला शुभेच्छा देतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी एक खोचक सल्ला संघाला दिला आहे. शोएब अख्तर म्हणाला, सगळ्यात आधी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या. विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून रोखा आणि तिसरा असा प्रयत्न करा की महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येणार नाही. मी तुम्हाला सांगतो की तो जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि सध्या चांगलाच फॉर्मात आहे.
यानंतर शोएब अख्तरने काही गंभीर मुद्द्यावरही चर्चा केली आहे. त्याने पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांना सल्ला दिला की त्यांनी धमाकेदार सुरुवात करावी. स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना त्याने सांगितलं की सलामीच्या फलंदाजानी कमीतकमी डॉट बॉल खेळायला हवेत. त्याचबरोबर गोलंदाजांना सल्ला देत तो म्हणाला की बचावात्मक खेळी करतानाच अधिक आक्रमक होत गोलंदाजी करा.