पुणे (वृत्तसंस्था) विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. दोन जागांवर विजय तसेच दोन जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय असल्याचं म्हटलं आहे.
धुळे-नंदुरबारमधील निकालाचं आश्चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे, नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेलं यश महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच एकत्रित येऊन वर्षभर केलेलं काम लोकांनी स्वीकारलं आहे. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असा खोचक टोला देखील शरद पवारांनी लगावला. पवार म्हणाले की, गेल्या वर्षभर काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागपूरची जागा कधीच मिळाली नव्हती तो गड कॉंग्रेसने जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं यश आहे. पुणे मतदारसंघातही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो जनतेच आभार अशा शब्दात त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. धुळे, नंदुरबार विधानपरिषदेचा निकाल हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वी होता. हा त्यांचा तो खरा विजय नाही, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका पवार यांनी केली.