
मुंबई (वृत्तसंस्था) आज २८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारचा वर्षभरातील लेखा-जोखा सादर करून एका वर्षांच्या कारभाराची पोलखोल केली. यावेळी ते असे म्हणाले की, ”एका वर्षात ठाकरे सरकारने कोणतीही अचिव्हमेंट केली नाही. आलेलं सरकार हे जनतेचा विश्वास घात करून आलं. मुख्यमंत्री पदाच्या घेतलेल्या शपथेचं कोणतंही पालन ठाकरे सरकारकडून होताना दिसत नाही. वेगवेगळ्या विकास कामांना स्थगिती देणं, याव्यतिरिक्त या सरकारकडे काहीच नाही,” असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.
दरम्यान ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपाची सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” असं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘ठाकरे सरकारची काळी पत्रिका’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जातोय.

















