ग्वालियर (वृत्तसंस्था) आपली पत्नी आपल्याला त्रास देत असून आपल्याला घरात कुठलाच अधिकार नसल्याची तक्रार तरुणाने पोलिसांकडे केली. दरम्यान, आपल्या पत्नी आणि मुलांच्या त्रासाला वैतागून पोलीस ठाण्यात तक्रार देताना त्याला रडू कोसळलं. एवढेच नाही तर आपली व्यथा सांगता सांगता हा तरुण चक्क गाणं म्हणू लागला. पोलिसांनी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन देऊन घरी पाठवलं.
वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी लागल्याची माहिती ग्वालियरमधील एका तरुणानं पोलिसांन दिली. तोपर्यंत आपलं आयुष्य सुरळीत सुरू होतं. मात्र नोकरी लागल्यावर काही दिवसांनी लग्न झालं आणि आपण आयुष्य बदललं, असं त्याने सांगितलं. वडील असताना घरातील सगळे मोठे निर्णय माझी आई घेत असे. मात्र लग्नानंतर आणि वडिलांच्या निधऩानंतर तिला काहीच अधिकार पत्नीने ठेवले नाहीत. आपल्या पगारातील ४ हजार रुपये आपण दरमहा आईला खर्चासाठी देत होतो. तिच्यावर तिचा खर्च भागत असते. मात्र आता पत्नीने हळूहळू आपल्याभोवतीचा पाश आवळायला सुरुवात केल्याची तक्रार त्यानं केली आहे.
पत्नीनं घेतले पैसे
पत्नीनं आपल्या सॅलरी अकाऊंटमधील सर्व पैसे तिच्या स्वतःच्या पर्सनल सेव्हिंग खात्यात ट्रान्सफऱ करून घेतल्याचं त्यानं सांगितलं. आपल्या भाचीचं लग्न तोंडावर आलं असून तिला आर्थिक मदत करण्याची आपली इच्छा आहे. मात्र आपले सगळे पैसे पत्नीच्या खात्यावर अडकून पडले असल्यामुळे आपण हतबल आहोत, अशी कैफियत त्यानं पोलिसांना सांगितली. काहीही करून आपल्याला आपले पैसे परत मिळावेत आणि आपल्या स्वतःच्या खात्यात ते जमा करता यावेत, यासाठी मदत करण्याचं आवाहन त्यानं पोलिसांना केलं.
पोलीस ठाण्यात कोसळलं रडू
आपली व्यथा सांगता सांगता हा तरुण चक्क गाणं म्हणू लागला. जब से हुई है शादी, आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी है, जिसको निभा रहा हूं, असं गाणं म्हणून तो पोलीस ठाण्यातच रडू लागला. पोलिसांनी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन देऊन घरी पाठवलं.