मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल अटी शर्थींसह सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबत घोषणा करताच भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं म्हणत टीका केली आहे.
येत्या १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होणार आहे. मात्र त्यासाठी काही अटीशर्ती असणार आहेत. मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेले असणं जरुरीचं आहे. तसेच दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेले असणं आवश्यक आहे, असा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनातून जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं सर्वसामान्य मुंबईकरांनी स्वागत केलं, तसं राजकीय पक्षांनीही स्वागत केलं. भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे भाजपच्या आंदोलनाचं फलित, असं दाखवून देणारं ट्विट केलं.
ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश…येत्या १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होतीय… ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं ट्विट करुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे ट्विट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना टॅग केलं.