मुंबई (वृत्तसंस्था) ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना सणसणीत टोला लगावला आहे.
राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत. तसंच, ‘महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो’, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दैनिक सामनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री – मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी ९२-९३ साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतं. राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही.