
भुसावळ (प्रतिनिधी) – लग्नावेळी तीन लाख रुपये – रोख, सोन्याची अंगठी आणि संसारोपयोगी साहित्य दिल्यानंतरही आणखी तीन लाख रुपयांची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहितेचा विवाह – १५ मे २०१५ रोजी झाला होता. विवाहावेळी – तिच्या वडिलांनी तीन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने तसेच इतर संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. विवाहानंतर – ती पतीसह संयुक्त कुटुंबात राहत होती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होती. मात्र, लग्नानंतर काही काळाने पती व सासरच्या मंडळींकडून तिच्याशी दुर्व्यवहार सुरू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पतीकडून वारंवार मारहाण, अश्लील शिवीगाळ तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंधांची मागणी केली जात असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. याशिवाय, वडिलांकडून प्लॉट खरेदीसाठी आणखी पैसे आणावेत, असा तगादा लावला जात असल्याचाही आरोप आहे. फिर्यादीनुसार, लग्नावेळी मोठी रक्कम व साहित्य दिल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण न केल्यास टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे तिने म्हटले आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

















