
पाळधी, शहाबाज देशपांडे : अल-फलाह फाउंडेशनतर्फे आयोजित शैक्षणिक प्रोत्साहन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअरच्या विविध संधी तसेच भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमात नीट परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी, विविध शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच एम.कॉम. आणि एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीसोबतच पालक, शिक्षक आणि समाजाच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पाळधी परिसरातील उत्कृष्ट शिक्षकांचाही शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या कार्याचा गौरव केल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास श्री. प्रतापराव गुलाबरावजी पाटील, डॉ. परवेज देशपांडे सर, डॉ. अब्दुल्लाह सर, सईद सर आणि मुश्ताक करीमी सर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शरीफ पटेल सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फैज पटेल सर यांनी केले.
अल-फलाह फाउंडेशनच्या ‘अल-फलाह स्टार टीम’मध्ये अध्यक्ष नेहाल मन्यार, उपाध्यक्ष आसिफ शेख, सचिव साबीर देशपांडे, उपसचिव वकार अहमद शेख आणि कोषाध्यक्ष समीर पिंजारी यांचा समावेश आहे. तसेच रईस मन्यार, वसीम शेख, शहबाज मन्यार, तौसीफ देशपांडे, शकील शेख आणि तनवीर मन्यार यांनी सदस्य म्हणून कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे म्हणजे केवळ त्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करणे नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे आणि इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे होय. अभ्यासातील यशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आचार-विचार, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सन्मान केल्याने ‘आपणही असेच यश मिळवायचे’ ही प्रेरणा इतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते.
सत्कार सोहळे हे केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या यशाला समाजाकडून मिळणारी कौतुकाची पावती आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारे माध्यम ठरतात. त्यामुळे शाळा आणि समाजाच्या पातळीवर अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व सन्माननीय अतिथी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांचे अल-फलाह फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.
‘आमचा उद्देश केवळ सन्मान करणे नाही, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा, योग्य मार्गदर्शन आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास देणे हा आहे. आजचे प्रोत्साहन हेच उद्याच्या यशाचा पाया आहे,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.
















