
धरणगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाडी क्र. 09071/09072 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे धरणगाव रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण व भव्य स्वागत करण्यात आले.
खानदेशच्या लोकप्रिय खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पश्चिम रेल्वेकडून आषाढी एकादशीनिमित्त ही विशेष रेल्वे दि. 23 व 24 जुलै रोजी चालविण्यात आली. गाडी क्र. 09071 उधना–पंढरपूर स्पेशल ही 23 व 24 जुलै रोजी अमळनेर स्थानकावर सकाळी 11:30 वाजता तर धरणगाव स्थानकावर दुपारी 12:05 वाजता थांबते. तसेच गाडी क्र. 09072 पंढरपूर–उधना स्पेशल ही 24 व 25 जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून सकाळी 10:30 वाजता सुटणार असून या विशेष सेवेचा लाभ पंढरपूरला जाणाऱ्या व परतीचा प्रवास करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना होणार आहे.
यावेळी खानदेश प्रवासी असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना केळीचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच धरणगाव येथून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
या स्वागत समारंभास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, धरणगाव तालुका प्रवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ZRUCC पश्चिम रेल्वे, मुंबई चे सदस्य, वारकरी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी नागरिक उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
















