जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटातील जिल्ह्यातील आमदार भाजपच्या संपर्कात असून, आगामी निवडणुकीत ते भाजपची उमेदवारी करणार असल्याचा गौप्यस्फोट केला.
पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगर या मतदारसंघांचा उल्लेख करत खा. राऊत यांनी सांगितले की, या भागातील आमदार योग्य वेळ येताच आपला राजकीय निर्णय जाहीर करतील. आपल्या दाव्याला ठोस माहितीचा आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आमदार सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळ येताच ते आपला राजकीय निर्णय जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेचा वापर करून आमदारांवर दबाव टाकणे, त्यांना आमिष दाखवणे आणि राजकीय समीकरणे बदलणे हीच सध्याची कार्यपद्धती झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुरी आणि बारामती येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार ज्या पक्षाची ज्या भागात ताकद आहे, त्या पक्षानेच निवडणूक लढवावी, असे त्यांनी सांगितले. बारामतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तेथे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. एखाद्या घटक पक्षाने निवडणूक लढवली, तर इतरांनी त्याला विरोध करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.















