यावल (प्रतिनिधी) लग्न म्हणजे साता जन्माची गाठ,आणि सुखी संसाराची वाट. लग्नानंतर पती-पत्नी हे नातं खऱ्या अर्थाने दृढ होतं. आयुष्याच्या सरत्या शेवटी वृद्ध काळात खरे तर पती-पत्नींचा एकमेकांना आधार असतो. म्हणूनच यावल तालुक्यातील किनगाव येथे येथील ७५ वर्षीय वृद्ध आणि जामनेर येथील ६६ वर्षीय वृद्धा यांचे शुभमंगल सावधान झाले. उतार वयातही दोघांनाही आता एकमेकांचा आधार मिळाला आहे.
किनगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक तायडे यांच्या पत्नी वत्सला तायडे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तायडे यांना दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. वडिलांनी आपल्याकडे राहायला यावे, असा मुलांचा आग्रह होता. मात्र तायडे यांना गावाची ओढ असल्याने ते किनगाव सोडायला तयार नव्हते. दुसरीकडे जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर यांना देखील वैधव्य आलेले. मूलबाळ नसल्याने त्या एकाकी जीवन जगत होत्या. या दोघा ज्येष्ठांचा विवाह सोहळा जामनेरातील संत रोहिदास महाराज मंदिरात पार पडला. या विवाहाला मोजके नातेवाईक उपस्थित होते.
असा जुळला आला विवाहाचा योग
पुंडलिक तायडे व चंद्रभागा सुरळकर हे दोन्ही वारकरी, दोन्ही आपापल्या गावातील वारकऱ्यांसोबत न चुकता मुक्ताईच्या वारीला जात असतात. तेथे दोघांची ओळख झाली. उतार वयात हक्काचा साथीदार असावा म्हणून दोघांचा विवाहाचा योग जामनेरातील वारकरी सिंधू सपकाळ यांनी ठेवला. प्रस्तावाला अन्य वारकऱ्यांनीदेखील पाठबळ दिले. दोघांनी नातेवाइकांशी चर्चा करून विवाहाचा निर्णय घेतला.