जळगाव प्रतिनिधी : प्रभाग क्र. १३ मधील विविध नागरी समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महापौरांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. महापालिकेवर अनेक महिन्यांपासून प्रशासक राज असल्यामुळे दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता, स्वच्छता घंटागाड्यांची अपुरी संख्या व वाहनांची अनुपलब्धता यामुळे स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रभागातील रस्ते, गटारी, ओपन स्पेस, सुशोभिकरण तसेच इतर आवश्यक नागरी कामे रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रभागातील नवीन विकासकामे मंजूर करणे तसेच मागील काही कामांबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या स्तरावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे नगरसेविका पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी प्रभागातील नगरसेवक नितीन प्रभाकर सपके, सौ. सुरेखा नितीन तायडे व प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह, संबंधित महापालिका अधिकारी व मक्तेदारांच्या उपस्थितीत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
ही बैठक झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील रखडलेली कामे मार्गी लागून नवीन विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केला आहे.















