धरणगाव (प्रतिनिधी) जांभोरे येथील शेतकरी शेतातील काम आटोपून घरी जात असताना मागावून येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत शेतकऱ्यासह त्यांच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. गोपाल केशव अहिरे (वय ६७), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दिवाळी सुरु होताच घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल अहिरे हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पारोळा ते धरणगाव रस्त्यावरुन जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक ते धरणगाव बस (एमएच- २०, बीएल- ३३६३) ने शेतकरी गोपाल अहिरे यांच्या बैलगाडीला मागाहून जबर धडक दिली. यात बैलगाडीचा चुराळा होऊन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडीवरील शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर अहिरे यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तत्काळ धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय त्यांना रुग्णवाहिकेने हलवण्यात आले. परंतु, गोपाल अहिरे यांच्या डोक्याला आणि कमरेला तसेच पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बस चालकासह वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोपाल अहिरे हे शेती व्यवसाय करायचे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबीय हतबल झाले असून दिवाळी साजरी करण्याआधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या कुटुंबाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकरी गोपाल अहिरे यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी गोपाल अहिरे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.