चोपडा (प्रतिनिधी) नाशिक येथून नातेवाईकाचा गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून चोपडा येथे परतणारे दोन जण अपघातात ठार झाले. चोपड्यानजीक रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला असून यात तीन जण जखमी देखील झाले आहेत. (Accident In Chopda)
कठोरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नितीन दामू मोरे (४५, रा.विद्या विहार कॉलनी, चोपडा) आणि गणेश काशिनाथ देशमुख (३२, रा, सुंदरगढी चोपडा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. गणेश देशमुख, गुड्डू देशमुख, बाबा देशमुख, चूनिलाल देशमुख हे चार जण नाशिक येथे गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून ते रविवारी रात्री रेल्वेने जळगाव येथे आले. दुध वाहून नेणाऱ्या गाडीने परतत असतांना अडावदनजीक एका ट्रकने या गाडीला मागून धडक दिली. त्यात दोन जण ठार झाले. तर गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडुरंग देशमुख (३०), चूनीलाल खुशाल देशमुख (३०) हे जखमी झाले आहेत.