जळगाव (प्रतिनिधी) आज (सोमवार) पहाटे बळीराम पेठेतून अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी लांबवली आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून भुरट्या चोऱ्या आणि दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बळीराम पेठेतील आसरा संकुलमध्ये चेतन रविंद्र वाणी हे परिवारासह राहतात. दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी स्वतःची बजाज पल्सर दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीटी.४४८८ काळ्या रंगाची ही अपार्टमेंटच्या बाहेर लावलेली होती. दि.१२ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचे वडील बाहेर आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. चेतन वाणी यांनी दुचाकीचा शहरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याची त्यांची खात्री झाली. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर आणि शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षणीय आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि जळगाव शहर पोलीस उपअधीक्षक यांना चोरट्यांनी खुले आव्हानच दिले आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन आणि तपास पथकावर वचक नसल्याने चोरट्यांचे फावले होत आहे. जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दर दिवसाला शहरातून दोन-तीन दुचाकी चोरी होत असल्या तरी चोरटे मात्र हाती लागत नाही. गेल्या महिन्याभरात बळीरामपेठ, शनीपेठ परिसरातून ५ ते ६ दुचाकी चोरी झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.प्रीतम मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तर शहर विभाग उपअधीक्षक म्हणून कुमार चिंथा यांनी पदभार स्वीकारला आहे. वाढत्या दुचाकी चोरी लक्षात घेता चोरट्यांनी नूतन अधिकाऱ्यांना खुले आव्हानच दिल्याचे दिसून येते. जळगाव शहरात दुचाकी आणि सायकल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून डीबी पथकाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने चोरट्यांचे फावले होत आहे. त्यातच डीबी पथकाकडून फिर्यादीला योग्य सहकार्य मिळत नाही. सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याने चोरट्यांना चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यास वेळ मिळतो. प्रभारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण डीबी पथकाला विश्वासात घेऊन नियोजन केल्यास सर्व चोऱ्या उघड होतील.