नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) नगरदेवळ्यासह परिसरात १३ सप्टेंबर रोजी रात्रभर कोसळलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने या भागातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना मोठा पूर आला आहे. यातच अग्नावती नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर परतीच्या दमदार पावसामुळे परिसरातील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नगदेवळा गावासह परिसरात १३ सप्टेंबरला रात्रभर दमदार परतीचा पाऊस कोसळला. यामुळे शेत शिवारातील ऐन उत्पन्नावर आलेल्या कपाशी, केळी, मका, ज्वारी, बाजरी, मूग, मठ आदी पिके जमिनदोस्त झाल्याने शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. तर नगरदेवळा शहराची मुख्य जीवन वाहिनी असलेल्या अग्नावती पात्रातील बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रात्रभर जागे राहून व्यावसायिक व नागरिक आपापल्या दुकानातील साहित्य काढताना दिसून आले. त्यातच शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या अग्नावती नदीवरील चारही फरशीपुल पाण्याखाली आल्याने दोन्ही गावांचा संपर्क खंडीत झाला होता. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.