नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारच्या मक्तेदारीच्या धोरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम उद्ध्वस्त झाले, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. जम्मू-काश्मीरमधील स्टार्टअप उद्योजकांची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील एका युवा स्टार्टअप मालकाच्या डोळ्यातील निराशा बहुतांश उद्योजक व लहान-मोठ्या व्यवसाय मालकांचा संघर्ष दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मक्तेदारीयुक्त धोरणामुळेच अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग देशोधडीला लागले आहेत. लोकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित करण्यात आले.
जीएसटी व नोटबंदीसारख्या चुकीच्या धोरणांमुळे या उद्योगांवर हल्ले झाले व भारताला उत्पादक अर्थव्यवस्थेतून उपभोग घेणाऱ्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित केले. या जोरावर आपण चीनसोबत स्पर्धा करू शकणार नाही व सर्वच भारतीयांसाठी समृद्धी आणू शकत नाही, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. भारताला चांगल्यात चांगले हवे आहे. आम्हाला रोजगाराच्या व्यापक संधी व रोजगार निर्मितीला चालना देण्याची नितांत गरज आहे. त्याकरिता जीएसटीला आणखी सुलभ बनवले पाहिजे. लहान व्यवसायांसाठी बँकिंग प्रणाली सुरू करावी. आपल्याला जीडीपीच्या मॉडेलपासून रोजगार निर्मितीकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.