बीड (वृत्तसंस्था) सहलीसाठी विद्यार्थी घेऊन रायगडकडे निघालेल्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिली. यात देवीच्या यात्रेहून परत गावाकडे निघालेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात दोघे मित्र जागीच ठार झाले. विजय ऊर्फ पप्पू संभाजी आव्हाड (३७) व विकास हरिभाऊ पवार (२७, रा. दोघेही कळंब) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कळंब येथील स्मशानभूमीत दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी) पाटीलगतच्या पुलाजवळ दि.१९ एप्रिल रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान हा अपघात घडला. दरम्यान, विजय व विकास हे दोघे मित्र बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कळंबहून दहिफळ ( ता. केज) येथील यात्रेसाठी आले होते. त्यानंतर यात्रेतील देवीचे दर्शन घेऊन ते रात्री आपल्या दुचाकीवरून परत कळंबकडे निघाले होते. त्याचेवळी सहलीसाठी रायगडकडे निघालेल्या अंबाजोगाई येथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.
मृत विकासच्या फोनवरून त्याचा भाऊ अमोलला फोन लावल्यानंतर दोघांची रात्री ११ वाजता ओळख पटली. ट्रॅव्हल्समध्ये विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झाली नाही. केज ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातासंदर्भात केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ट्रॅव्हल्स चालक फरार झाला आहे.