जळगाव (प्रतिनिधी) पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका घटनेत पतंग उडवण्यासाठी जाऊ दिलं नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत पतंग उडवताना विजेच्या तारांचा शॉक लागून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हितेशचं पतंग विजेच्या तारांवर अडकलं होतं. ते पतंग काढताना त्याला विजेचा शॉक लागला. तर दुसरी घटना शहरातील कांचननगरात पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत यानं झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्हीं घटनांमुळे मकर संक्रांतीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
















