जळगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील (Mp Unmesh Patil) यांनी आमच्या नादी लागू नये, नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील हे तर चिल्लर आहेत. त्यांना आम्ही केव्हाच खपवू, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी गेल्या आठवड्यात काढलेल्या गिरणा परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच अनधिकृत वाळू उपश्याला पालकमंत्री खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघात एकही ठोस काम केलेले नाही. त्यामुळे नागरिकांचे आपल्याकडे लक्ष रहावे म्हणून गिरणा परिक्रमेचा स्टंट त्यांनी केला. परिक्रमा पायी करायची असते. मात्र गाडीत फिरले. तसेच ज्या रस्त्यांवर ते फिरले ते शेतरस्तेदेखील गुलाबराव पाटील यांच्या निधीतूनच झालेले आहेत हे ते विसरले, खासदारांनी परिक्रमा करण्यापेक्षा प्रत्येक गावात स्वच्छतागृह तरी बांधले का याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान गुलाबराव पाटील यांनी खासदारांना दिले आहे. अनधिकृत वाळू उपसा करण्याच्या कामात असलेले चेतन शर्मा हे कोणत्या पक्षाचे आहेत? हे देखील खासदारांनी सांगावे. वाळू व्यवसायात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी असून, आधी त्यांनी हे तपासून पहावे, मगच बोलावे असा सल्लासुद्धा पालकमंत्र्यांनी दिला आहे.
२१ वर्षात बलून बांधणाऱ्यांचा प्रश्न का सुटला नाही ?
सात बलून बंधाऱ्यांचा मुद्दा डोक्यावर घेऊन खासदार आज फिरत आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या २१ वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मात्र, या कार्यकाळात त्यांनी हा मुद्दा का मार्गी लावला नाही? असा सवाल करतच त्यांनी गिरणा परिक्रमा हा केवळ स्टेट असल्याची टीका त्यांनी केली.
खिल्ली उडविण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेणे उचित ठरेल
गिरणा परिक्रमा या विषयाचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. गिरणामाईमुळेच आपल्या सर्वाची जडणघडण झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेणे उचित ठरले असते. परंतु ते परिक्रमेची खिल्ली उडवत आहे. त्यांनी मिळून काम करण्याची भुमिका घ्यायला हवी, मात्र ते आडवा करण्याची जिरवण्याची भाषा करीत आहे. हे काम निवडणुकीत सर्वसामान्य जनता करेल. शेतीमातीसह गिरणाखोरयासाठी मिळून काम करावे. अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही, असं खासदार उन्मेष पाटील म्हणाले