नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारचे काम गुन्हेगारांचे रक्षण करणे नाही, यूपी सरकार पीडितांना न्याय देत नाही. यूपी सरकारने गुन्हेगारांना तुरूंगात टाकले पाहिजे. देशातील कोट्यवधी महिलांसोबत असे घडते, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवरून यूपी सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबविली. त्याअंतर्गत राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याचबरोबर, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, “हाथरस घटनेत सरकारचे वागणे अमानवीय आणि अनैतिक आहे. पीडितेच्या कुटूंबाला मदत करण्याऐवजी ते गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चला, देशभरातील महिलांवर होणाऱ्या अन्यायविरूद्ध आवाज उठवूया – एक पाऊल बदलाच्या दिशेने. राहुल गांधींच्या अगोदर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करून यूपी सरकारला लक्ष्य केले होते.