जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मुंबई येथील व्हिजीलन्सचे पथक ठाण मांडत कसून चौकशी करत आहे. परंतू याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी एक अधिकारी आणि काही एजंटमध्ये जोरदार वाद झाला होता. व्हिजीलन्सचे पथक येण्यामागे याच वादाची किनार असल्याची जोरदार चर्चा आरटीओ कार्यालयात रंगलीय.
आज सकाळपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मुंबई येथील व्हिजीलन्सचे पथक ठाण मांडत कसून चौकशी करत आहे. पथकाने संपूर्ण आरटीओ कार्यालयाचा ताबा घेतल्यापासून कामाव्यतिरिक्त कुणालाही कार्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. काही जण व्हिजीलन्सची चौकशी हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचे सांगताय. तर दुसरीकडे काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र, दोन दिवसापूर्वी आर्थिक देवाण-घेवाणीवरून एक अधिकारी आणि काही एजंटमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यांनतरच व्हिजीलन्सचे पथक जळगावात पोहचले असल्याची बोलले जात आहे. कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात लायसन्ससह इतर गोष्टी मिळविण्यात दिरंगाई होतेय. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी मिळविताना २० ते २५ दिवस लागताय. कधी-कधी तर महिना होऊन देखील विषय मार्गी लागत नाही. कामास जास्त उशीर होत असल्यामुळे काही लोकांनी नियमित आर्थिक विषय आम्ही का करावा?, असा मुद्दा उपस्थित करत एका अधिकाऱ्याशी वाद घातला. त्यानंतर हा वाद आरटीओ कार्यालयात मोठा चर्चेचा विषय ठरला होता. अगदी तेव्हापासूनच काही तरी मोठा विषय होईल अशी देखील चर्चा रंगली होती.
दरम्यान, नियमित तपासणीच्या नावाखाली एजंट लोकांना अद्दल घडवण्यासाठी कारवाईचा देखावा होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर याआधी अशा पद्धतीचे व्हिजीलन्सचे पथक येऊन गेले. परंतू त्यानंतर कुणावर काय कारवाई झाली?, किंवा तपासणीत नेमकं काय आढळून आले?, हे कधीही समोर येत नाही. त्यामुळे व्हिजीलन्सचे पथकाची तपासणी फक्त चौकशीचा फार्स असतो, अशी देखील प्रतिक्रिया काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. परंतू व्हिजीलन्सचे पथक आरटीओ कार्यालयात आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडालीय, एवढं मात्र निश्चित !

















