मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी फेटाळत फडणवीसांवर पलटवार केला आहे. दोन प्रकरणांबाबत गोटे यांनी बुधवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारी बँकेतील घोटाळा आणि रावल यांना क्लीनचीट दिल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.
माध्यमांशी बोलताना गोटे म्हणाले, मी पांडे यांच्याकडे दोन प्रकरणांची तक्रार केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचा तपास त्यांच्याकडे सुरू आहे. त्या तपासात मदत करावी म्हणून मी त्यांना लाभार्थ्यांची दोन नावे दिली. २०१४-१५ मध्ये दहा कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये दहा कोटी रुपये असे वीस कोटी रुपये हे भाजपला देण्यात आले आहेत. मी त्याला निवडणूक आयोगालाही पुरावा दिला आहे, हे पहिलं प्रकरण असल्याचं गोटे यांनी सांगितलं.
मुंबई फेस्टिवलचं दुसरं प्रकरण आहे. २०१८ मध्ये मुंबई फेस्टिवल घेण्यात आलं होतं. त्यात जवळपास ९० कोटी रुपये खर्च झाले. मुळात सरकारचा असा काहीही कार्यक्रम नव्हता. पण रावल यांनी स्वत:च्या अधिकारात फेस्टिवल घडवलं. त्यासाठी एक वर्षाचं टेंडर मागवण्यात आलं होतं. पण ज्यावेळी टेंडर देण्याची वेळ आली, त्यावेळी ते पाच वर्षांचं करण्यात आलं. हे बेकायदेशीर होतं. त्यासाठी त्यांनी तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांचा उपयोग केला. वस्तुत: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात हे पदच नाही. राठोड यांना यांनी शोधून आणलं. राठोडांवर ५० कोटी भ्रष्टाचार यांसह तीन गुन्हे आहेत, असा आरोप गोटे यांनी केला.
विजय वाघमारेंनी तक्रार करताच बदली
विजय वाघमारे हे त्यावेळी खरे व्यवस्थापकीय संचालक होते. ते एक आठवडा रजेवर असताना रावल यांनी हा काळाबाजार केला. वाघमारे हे रजेवरून कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी या घोटाळ्याबाबत सचिवालयात कळवलं. हे षडयंत्र असून गंभीर गुन्हा आहे, तुम्ही चौकशी करणार नसाल तर आम्हाला परवानगी द्या, असं पत्र त्यांनी लिहिलं होतं. वाघमारे यांनी सायंकाळी पाच वाजता ही फाईल वर्षा बंगल्यावर पाठवली. त्यांची दुसऱ्या दिवशी बदली केली. फडणवीस यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठिशी घालत सभागृहात क्लीनचीट दिली. एवढं नव्हे तर हे प्रकरण दाबून टाकल्याचा गंभीर आरोपही गोटे यांनी केला आहे.