मुंबई (वृतसंस्था) मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आयएसआय शिक्क्यासहच विकलं जावं, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्याचबरोबर कोल्ड जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील थंड पाण्याच्या आरओ प्लान्ट विरोधात कारवाई सुरु झाली आहे. हे थंड पाण्याचे जार आरोग्यास अपायकारक असल्याचा ठपका राष्ट्रीय हरित न्यायालयाने ठेवत कारवाई सुरु केली आहे. शहरातील अनेक प्लान्ट सील करण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या अमरावती शहरात १५० आरओ प्लान्ट आहेत. तर जिल्ह्यात जवळपास एक हजारच्या जवळपास आहे. लाखो रुपये गुंतवून लोकांनी हे प्लान्ट उभे केले आहे. एका दिवसात त्यांचा इतका मोठा व्यवसाय बंद झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. मात्र खरच हे पाणी आरोग्यास घातक आहे का? थंड पाण्याची निर्मिती करताना योग्य काळजी घेतली जाते का? अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेले शहरातील जवळपास १५० आणि जिल्ह्यातील एक हजार आरओ वॉटर प्लॅन्टवर कारवाईचा बडगा उगारत हे प्लान्ट सील करणे सुरु केले आहे. अमरावती महापालिकेच्या बाजार परवाना विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने आतापर्यंत शहरातील २४ आरओ प्लान्ट सील केले आहे. ही कारवाई राष्ट्रीय हरीत लवादा आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे आदेशाने करण्यात आली आहे. तसेच भुःगर्भातून पाण्याचा उपसा अत्याधिक होत असल्याने बिनापरवानगी सुरु असलेले प्लान्ट तत्काळ सील करण्याचे आणि केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे.