जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्ग ६ वरील भालगाव फाट्याजवळ एसटीचे चाक निखळल्याने भीषण अपघात झाला तसेच याच महामार्गावर वराड गावाजवळ कुझर गाडीचे चाक निखळल्याने नववधुसह तीनजण जागीच ठार झाले तर पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथे टायर फुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात नववधुसह दोनजण जागीच ठार झाले. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात पाचजण ठार झाल्याची घटना बुधवारी घडली.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन भीषण अपघातांमध्ये पाच
जणांचा मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. या तिन्ही घटनांमध्ये वाहनांच्या चाक अन् टायर बिघाडामुळे अपघात घडल्याचे समोर आले आहे. दोन घटनांमध्ये वाहनाचे चाक निखळले, तर एका ठिकाणी टायर फुटल्याने अपघात झाला. ही तिन्ही वाहने विदर्भातील आकोला व अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या भागांकडे जात होती. विशेष म्हणजे, या वाहनांतील प्रवासी लग्नकार्याच्या निमित्ताने प्रवास करत होते. आनंदाच्या प्रसंगी निघालेल्या या प्रवासावर दुर्दैवी सावट आले. या अपघातांमध्ये नववधूसह आठ दिवसांवर लग्न ठरलेली तरुणी यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, काहींची
प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
जखमींना १० मिनिटांत मदत
अपघातग्रस्त क्क्रुझर वाहन रस्त्यावर आडवे झाल्याने वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामस्थांनी एकत्र येत वाहन सरळ केले आणि मदतकार्य सुरू ठेवले. नववधूसोबत प्रवास करणारे इतर प्रवासीही घाबरलेल्या अवस्थेत होते. घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.
















