जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही दुचाकीवरून खाली पडल्यानंतर तिघांना रिक्षाने चिरडल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी दहा वाजता घडली होती. भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली मात्र सोबत असलेल्या इतर महिलेसह तरुणीची ओळख पटलेली नव्हती. त्या दोघांचीही बुधवारी सकाळी ओळख पटली असून दोघेही मायलेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गायत्री प्रविण कुळकर्णी (वय-३४) आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी (वय-११) दोन्ही रा. शिवाजी नगर, जळगाव ह.मु.बडवाणी मध्यप्रदेश असे मयत झालेल्या दोन्ही मायलेकीचे तर महेश गोकूळ जोशी (रा. पिंप्री ता. धरणगाव) मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.
असा झाला अपघात !
जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी सकाळी दहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी हे त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि एक तरूणी बसलेली होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालका रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हे जखमी झाले. या भीषण अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार आणि दोन अनोळखी महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न..अशी पटली ओळख !
यात अपघातात दुचाकीवरील तीन जणांपैकी दुचाकीस्वार महेश जोशी यांची ओळख पटली होती. तर सोबत असलेल्या ४० वर्षीय महिला आणि तरुणीची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय नयन पाटील, कर्मचारी नरेंद्र पाटील, अनिल फेगडे, अनिल मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. महेश जोशी याच्या मोबाईल लोकेशनवरून थेट चोपड्यापर्यंत आणि मध्य प्रदेशातील काही गावांपर्यंत देखील महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले होते. दरम्यान मंगळवारी रात्री मयत महिलेच्या बहिणी आणि पती देखील शोधण्यात तालुका पोलिसांना यश आले. त्यांना दोघांचे मृतदेह दाखवून ओळख पटवण्यात आली. सदरहू महिला ही गायत्री उर्फ सिमा प्रवीण कुलकर्णी (वय ३२ वर्षे) आणि तरुणी ही नंदिनी प्रवीण कुलकर्णी (वय ११, दोन्ही रा. छ. शिवाजी नगर, जळगाव, ह.मु. बडवाणी, मध्य प्रदेश) या असल्याचे निष्पन्न झाले.
ज्या शाळेत जात होते, त्याच शाळेसमोर काळाची झडप !
महेश जोशी व गायत्री कुलकर्णी हे एकमेकांचे नातेवाईक आहे. गायत्री यांची मुलगी नदिनी हीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गायत्री ह्या मुलीसह नातेवाईक महेश जोशी यांच्या दुचाकीने कानळडा रोडवर असलेल्या समर्थ शाळेत जात होते. याच ठिकाणी महेश जोशी यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने ते घ्यावी रस्त्यावर पडले व त्यानंतर तिघांना रिक्षाने चीरडले व यात तिघांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
एकाचवेळी मायलेकीवर अंत्यसंस्कार !
मयत गायत्री यांच्या पश्चात पती, मुलगा मंदार, तर माहेरी चोपडा येथे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मयत गायत्री या त्यांची बहीण यांच्याकडे काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील बडवाणी येथे राहत होत्या. तर महिलेचा पती प्रवीण कुलकर्णी हे जळगावात रिक्षा चालक आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहे. एकाचवेळी मायलेकिवर अंत्यसंस्काराच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.