धुळे (प्रतिनिधी) परमबीर सिंग प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे किती पैसे गेले?, याची चौकशी झाली, असे वक्तव्य आमदार अतुल भातकळकरांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी चांगलाच समाचार घेत राफेल व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाला. यासाठी फ्रान्स सरकारने चौकशी कमीशन नेमले आहे. मग आम्ही असे म्हणायचे का की, राफेलमध्ये दिल्लीतील शहा आणि शहनशहा यांना किती टक्के मिळाले हे जाहीर करावे, असा टोला लगावला आहे.
आमदार अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटलेय की, राज्यातील भाजपाची सत्ता गेल्याचे दुःख भाजपाचे नेते अजुनही पचवू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला की, राज्यातील भाजपा नेत्यांनी पहील्या दिवसापासून उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवार टिका करणे याशिवाय दुसरा उद्योग केला नाही. देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची गणना केली जाते. पाच मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. याची खंत वाटण्याएवजी राज्याचे मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. राज्याचे नागरीक म्हणून अभिमान तर सोडाच पण पोटदुखीच जास्त आहे. याला वांझोटीचे दुःख म्हणतात. भाजपाच्या काही नेत्यांना नव्याने कंठ फुटला आहे. उठसुठ मुख्यमंत्र्यांवर आणि शरद पवारांवर बेछूट टिका करायची. मुद्दाम वादग्रस्त विधाने करून चमकोगिरी करायची आणि प्रसिध्दी येवून संदर्भहीन मुद्दे उकरून काढायचे हा नित्याचाच उद्योग झाला आहे.
सुसंस्कृत जबाबदार पक्ष म्हणून कधीकाळी भाजपाची असलेली प्रतिमा पार रसातळाला गेली आहे. सत्तेसाठी वखवखलेल्या अन्य पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा समूह एवढीच ओळख नव्याने निर्माण केली आहे. अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेतांना त्यांची आर्थिक कुवत, त्यांच्या टोळीचे साम्राज्य आणि निवडून येण्याची क्षमता एवढ्या निकषावरच भाजपला वहोमय सुज आली आहे. अन्य पक्षातून भाजपामध्ये आलेल्या आमदार, खासदार अगदी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद भुषविलेल्या अनेक नेत्यांना संघाची प्रार्थनासुध्दा माहीत नाही. शेजारचा कशी हालचाल करतो हे बघुन संघ शाखा भरली की तसा प्रयत्न करायचा याचा मी स्वतः नागपूर अधिवेशनवेळेस संघ स्थानावर घेतला आहे. रेशमबाग ह्या संघाच्या राष्ट्रीय कार्यालयात संघ संस्थापक माननीय डॉ. हेगडेवारांच्या स्मारकाला वंदन करतांना भाजपामध्ये अनेक नवप्रवेशीत आमदारांनी मला दबक्या आवाजात विचारले, “गोटेसाहेब हे कोण ?” त्यांना परम पुज्य डॉक्टरांबद्दल संघ संस्थापकांबद्दल माहीत नाही. हिंदुत्वाशी त्यांना काय देणे घेणे वाहत्या गंगेत आपलं घोड न्हावून निघाल याचा त्यांना आनंद आहे.
आता विनोद असा आहे की, ज्यांचा संघ परिवाराशी किंवा ज्यांना संघ विचाराचा स्पर्शसुध्दा झाला नाही. असेच लोकही टिका करतात की, राज्याच्या सत्तेत काँग्रेसबरोबर व राष्ट्रवादीबरोबर शिवसेना सहभागी झाली! याचा अर्थ शिवसेनेने हिंदूत्वच सोडले. माझा अशा सर्व हायब्रीड भाजपावाल्यांना सवाल आहे की, ज्या महिलेला आपण देशद्राही म्हणत होतात विधानसभेच्या निवडणुकीत देशद्रोही म्हणत होतात. विधानसभेच्या निवडणुकीत देशद्रोही पाकीस्तान धार्जिणी म्हणून जिची बदनामी केली. त्याच मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपाने सार्वजनीक लाज लज्जा सोडून सरकार स्थापन केले. याचा अर्थ मग भाजपातले वरिष्ठ नेते पाकिस्तान धार्जिणे झाले का ? की देशद्रोही झाले ? पण वायफळ बडबड करून केवळ मनोरंजन करणे एवढाच भाजपाचा उद्देश असावा. भाजपा नेते झोपेत बरळण्यासारखे बरळतात.
सचिन वाझे परमबीर सिंग या प्रकरणात हळूहळू स्पष्टता येत चालली आहे. प्रकरणाचे आर्किटेक्ट हे स्वतः परमबीर सिंगच होते व पोलीस खात्यात असलेल्या खाकी गणवेशातील गुन्हेगारांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांना हाताशी धरून परमबीर सिंग हे स्वतःच एक खाकी गणवेषातील सरकारमान्य टोळी चालवीत होते. ‘परमबीर सिंगाची बदली केल्यानंतर परमबीर सिंगांना बळीचा बकरा केला आहे. असे भाजपाने आरोप करावे याचेच आश्चर्य वाटते. अनिल देशमुखांनी भ्रष्टाचार केला की, नाही हा प्रश्न अनिल देशमुख आणि तपासीएजन्सी मधला आहे. ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळ्यात पडेल” पण केवळ एवढा धागा पकडून वाझे, ‘परमबीर सिंग प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे किती पैसे गेले याचीही चौकशी झाली पाहिजे.. असे आमदार भातकळकरांनी केलेले वक्तव्य माझ्या वाचनात आले. म्हणूनच भातकळकरांना माझा सावाल आहे की, राफेल व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाला. यासाठी फ्रान्स सरकारने चौकशी कमीशन नेमले आहे. मग आम्ही असे म्हणायचे का की राफेलमध्ये दिल्लीतील शहा आणि शहनशहा यांना किती टक्के मिळाले हे जाहीर करावे. चिक्की घोटाळ्यात देवेंद्र फडणवीसांचा किती हिस्सा होता ? तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रीमंडळातून सुट्टी करण्यात आली मग फडणवीसांना हफ्ता मिळाला नाही म्हणून त्यांनी हकालपट्टी केली”. हे म्हणणे जेवढे हस्यास्पद ठरेल तेवढेच मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांबद्दल भातकळकरांनी केलेले वाझे, परमबीर सिंग प्रकरणातील वक्तव्य शहाणपणाचे ठरत नाही.
अतुल भातकळकर हे माझे सहयोगी होते. माझ्यासारखेच ते मुंडे साहेबांचे समर्थक होते. फरक एवढाच की, ते पक्षात होते. मी भाजपा पक्षात नव्हतो. तरीपण मी मुंडे साहेबांचा समर्थक होतो. यामुळे विलासराव देशमुख आणि अतुल भातकळकर प्रकरणाची मला खडान् खडा माहीती आहे. विलासराव देशमुखांनी कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त होता कामा नये, असा विचार करून आणि केवळ मुंडे साहेबांच्या मैत्रीला जागून काही गोष्टी केल्या. पण मी एवढेच सांगतो, “शरद पवार साहेब म्हणजे विलासराव देशमूख नाहीत. या वाक्यातील गांभीर्य समजून घ्या! माननीय नितीनजींनीसुध्दा अनेक समारंभामध्ये खुल्या मनाने कबुली दिली आहे की, “शरद पवार साहेब सोडून सर्वांशी पंगा घ्या !” एकेकाळचा सहयोगी म्हणून मी तुम्हाला सल्ला देतो. एकलेत तर, माझा काहीच फायदा नाही. असा मौलिक सल्ला. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी शेवटी पत्रकात दिला आहे.