मुंबई (वृत्तसंस्था) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेतकऱ्यांच्या हातातून स्वतःच्या ताब्यात घेणारे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनी कुणाची ? यांचे उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी जरंडेश्वर साखर कारखाना परिसराला भेट दिली. परिसराची पाहणी केली. यावेळी कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमय्या यांचे जंगी स्वागत केले. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बऱ्याच सभासदांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात यावा अशी प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे केली.
कारखाना चांगला सुरु होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्रही मोठे होते. मात्र त्यावेळी कारखाना कवडी मोल भावाने कारखान्याचा व्यवहार केला. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. सत्तेच्या जोरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय. पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा. तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही काही करा कसेही करा आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या अशी मागणी सोमय्यांकडे जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी कारखाना स्थळावरच केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर किरीट सोमय्या आल्यानंतर घेराव घातला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण हे जाहीर करावे. त्यांनी एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा असे आव्हान सोमय्या यांनी दिले. कोणताही कारखाना अडचणीत येऊ शकतो. त्याला सरकारने मदत करायला पाहिजे. मात्र अनेक बेनामी कंपन्यांमधून संशयास्पद व्यवहार करून हा कारखाना अजित पवार यांनी कारखाना घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हा कारखाना माझा असल्याचे त्यांनी जाहीर करावे त्यांनी असे आव्हानही त्यांनी दिले.