मुंबई (वृत्तसंस्था) हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. ‘जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत. त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?,’ असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला.
“शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?” असा घणाघात भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. “ठाकरे सरकारची साधूसंताना न्याय देण्याची इच्छा नाही आहे,” असेही नारायण राणे म्हणाले. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी जन आक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु यात्रा सुरु होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांची सुटका घेतल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी राम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘भाजपशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून बसले, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता केला, तिथंच त्यांनी हिंदुत्व सोडलं. सर्वधर्म समभाववाल्यांसोबत गेलेल्यांकडून साधूसंतांच्या रक्षणाची अपेक्षा ह्यांच्याकडून काय करणार?,’ असा सवाल राणेंनी केला. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असे म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. ‘मागच्या एक वर्षात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काय काम केलं? कृषी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था कुठल्या क्षेत्रात काम केलं? फक्त पिंजऱ्यात बसतात आणि राम राम म्हणतात. म्हणूनच आमच्या राम कदमांना आंदोलन करावं लागतंय,’ असा चिमटाही राणेंनी काढला.