मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घटली आहे. दरम्यान, मास्क वगळता राज्यातील कोविडचे सर्व नियम उठविण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी लसीकरणाला हवा तितका वेग आलेला नाही. यामुळे आगामी काळात लसीकरणाला गती देण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आलेले आहे. कोविडची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रवासासह अन्य काही बाबींचा अपवाद वगळता आधीच निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तर प्रवासाबाबतही लवकरच निर्णय होणार आहे. आगामी काळात गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आधीप्रमाणेच साजरा होणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले.
दरम्यान, कोविडचे सर्व नियम उठविण्यात येणार असले तरी तूर्तास मास्कची सक्ती कायम राहणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कोविडच्या नियमांपासून मुक्तता मिळण्याआधी टास्क फोर्ससोबत चर्चा करण्यात येईल. नंतर याबाबतची अधिकृत घोषणा होईल. तथापि, मास्कची सक्ती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेतत्यांनी दिले आहेत.