नागपूर (वृत्तसंस्था) ‘देवाची पालखी घेऊन आलो. दान करा,’ असे म्हणून साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी सासू-सुनेला ‘तुमच्यामागे बला लागली आहे,’ असे म्हणून त्यांच्या हाताला लाल रंगाचा धागा बांधला. त्या धाग्याच्या माध्यमातून दोघांनी गुंगीचे द्रव्य फवारून, संमोहित करून बेशुद्ध केले आणि दोघींच्याही अंगावरील दागिने लुटून नेल्याची घटना यशोधरानगर परिसरात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यशोधरानगर हद्दीतील धम्मदीपनगरच्या महालक्ष्मी किराणा दुकानाजवळ राहणाऱ्या वर्षा करण बोरकर (२५) या व त्यांच्या सासू अशा दोघीही २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी होत्या. दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. बाहेर बसलेल्या सासूला त्यांनी ‘आम्ही पालखी घेऊन आलो आहे. काही दान करा’, असे म्हटले. सासूने सुनेला दहा रुपये देण्यास सांगितले. त्यांनी ते दिले. थोड्या वेळाने त्यांनी पिण्यास पाणी मागितले. पाणी पिल्यावर त्यांनी सासू व सुनेला ‘तुमच्यामागे बला लागली आहे,’ असे म्हणून दोघींच्या हाताला लाल रंगाचा धागा बांधला व घराच्या दाराला पिवळ्या रंगाचे कापड बांधले. हे सर्व सुरू असताना दोघांनी सासू आणि सुनेकडे एकटक पाहत असताना त्यांची शुद्ध हरपली.
दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे भासरे घरी आले असता दोघी घराच्या दारात शुद्ध हरपल्याप्रमाणे पडलेल्या दिसल्या. आवाज देऊनही त्या उठल्या नाही, म्हणून त्यांनी दोघींच्या तोंडावर पाणी मारून उठविले. सुनेने लगेच गळ्याला हात लावला असता गळ्यातील सोन्याची ८ हजारांचे मंगळसूत्र दिसले नाही. अज्ञात व्यक्तीने हातात धागा बांधण्याच्या बहाण्याने गुंगीकारक द्रव्य लावून बेशुद्ध केले व विश्वासघात करून सोन्याचे मंगळसूत्र नेऊन फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी वर्षा करण बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.