सातारा (वृत्तसंस्था) येथील कण्हेर कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून भीषण दुर्घटना घडली. यात चार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), सीता निवृत्ती साळुंखे (वय ६५), उल्का भरत माने ( वय ५५) अशी मयत महिलांची नावं आहेत. अपघातामध्ये आणखी एक महिला जखमी झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पावसाने केला घात !
कारंडवाडी येथील हा ट्रॅक्टर असून, दुर्घटनेतील महिला शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील कामे उरकून त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून परत येत होते. जोरदार पावसामुळे कण्हेर कॅनॉललगत असलेला कच्चा रस्ता चिखलाने माखला होता. जैतापूर गावच्या हद्दीमधून कॅनॉलचा रस्ता निसरडा बनला आहे. या रस्त्यावरुन वळण घेत कॅनॉलवरील पूल ओलंडताना ट्रॉली थेट कॅनॉलमध्ये पलटी झाली. यामुळे ट्रॉलीमध्ये बसलेल्या महिला कॅनॉलमध्ये पडल्या.
चार महिलांचा जागीच बुडून मृत्यू !
ट्रॉली उलटी झाल्याने चार महिला ट्रॉलीखालीच दबल्या गेल्या. यामुळे त्या महिलांचा जागीच बुडून मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनॉलमधून बाहेर काढले. यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कारंडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर मृत महिलांच्या कुटूंबिय व नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.