मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्यानं ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
आमचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात स्टेट युटिलिटी मजबूत झाली. त्याच्या आधी परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात त्याची परिस्थिती काय होती, याची आकडेवारी बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे. आपलं अपयश लपवण्याकरिता कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, तर कधी गेल्या सरकारकडे बोट दाखवायचं. तुमच्यात ताकद आणि शक्ती असेल तर वीजबिल माफीची घोषणा करा, नाहीतर घोषणा करू नका, असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे.
तत्पूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊतांनीही तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले होते. कोरोना काळात वीजबिले भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली. वाणिज्य ग्राहकांची 879 वरून 1241 कोटींवर तर औद्योगिक ची 472 वरून 982 कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीजबिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली, असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत सांगितलं होतं. त्यावरच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे.